कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचातीला मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा कारभार पेपरलेस झाला असून, ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत.
ग्रामपंचायतीच्या ई-ग्रामसॉफ्ट पंचायत प्रणालीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीया सावंत, सावडावचे सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, विस्तार अधिकारी अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ग्रामपंचायतीचा कारभार ‘पेपरलेस’ झाल्याने जुने रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे. यापुढे ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत. गावातील विकासकामांवर किती निधी खर्च झाला, याची माहितीही ऑनलाइन मिळणार आहे. गावातील लाभार्थ्यांचे अनुदान किंवा ठेकेदारांची बिलेही थेट बँकेतच जमा होतील. यापुढे धनादेश बंद केले जातील. कोणत्याही प्रशासकीय कामाचा आदेश १५ फेब्रुवारीपर्यंतच दिला जाईल. त्यानंतर काम सुरू केले जाणार नाही. या कामांची बिलेही ३१ मार्चला दिली जातील. त्याच दिवशी वार्षिक व्यवहार पूर्ण होतील,’ असे रणदिवे यांनी सांगितले.
‘ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा भाग आहे,’ असेही रणदिवे यांनी सांगितले.